

पुणे : “माहिती अधिकार कायदा हा केवळ कागदोपत्री नसून तो जनतेच्या हाती दिलेला एक प्रभावी हक्क आहे. या हक्काच्या माध्यमातून नागरिक शासनाच्या प्रत्येक निर्णयावर लक्ष ठेवू शकतात. त्यामुळे हा कायदा शिकणे म्हणजे लोकशाही सशक्त करणे होय,” असे प्रतिपादन माहिती अधिकार कायदा प्रशिक्षक श्री. अब्राहम आढाव यांनी केले.
ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्या वतीने दिनांक १ जून २०२५ रोजी श्री. बाळासाहेब ठाकरे कलादालन, स्वारगेट येथे माहिती अधिकार अधिनियम 2005 यावर दुसरी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील ५० हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
श्री. आढाव यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “शासन कोणत्याही स्तरावर असो – ग्रामपंचायत, महानगरपालिका वा मंत्रालय – माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून नागरिक त्यावर प्रश्न विचारू शकतात. योग्य प्रश्न विचारल्यास चुकीचे निर्णय रोखता येतात. हीच या कायद्याची खरी ताकद आहे.”
कार्यशाळेच्या आयोजनात गिरीश झगडे, अंकुश नरवडे आणि गिरीश झगडे यांनी संयोजनाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहभागी नागरिकांना सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव जाधव सर पुणे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. शेवटी अंकुश नरवडे यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.




