

जळगाव – शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या प्रमाणात साखरयुक्त पेय आणि पदार्थांच्या सेवनामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन जिल्हा परिषद, जळगावने एक अभिनव उपक्रम राबविण्याची सुरुवात केली आहे. “नो शुगर” या नावाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि साखरेचे अतिसेवन रोखणे हा आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये “नो शुगर” फलक लावण्यात येत आहेत. या फलकांवर विविध शीतपेयांतील अॅडेड शुगरचे प्रमाण स्पष्टपणे दर्शविण्यात आले असून विद्यार्थ्यांना प्रक्रिया केलेल्या साखरेचे दुष्परिणाम समजावून सांगितले जात आहेत.
साखरेचे अतिसेवन टाळल्यास मधुमेह, लठ्ठपणा आणि वजनवाढ यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. शालेय स्तरावरच योग्य आहारशिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैली अंगीकारण्याची सवय रुजेल, असा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.
आरोग्यदायी, शाळांमध्ये वापरयोग्य आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दीर्घकालीन परिणामकारक ठरणारा हा उपक्रम जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा आहे.




