

जळगाव, दि. १३ मे –
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आज “सैनिक सेवा दिवस” कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सैनिक, माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या सन्मानार्थ करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी उपस्थित वीर, वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता आणि माजी सैनिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

सदर कार्यक्रम सकाळी १० वाजता सुरू होऊन दुपारी १ वाजेपर्यंत सुरू होता. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. प्रसाद यांनी सैनिकांच्या पुनर्वसन, निवृत्तीवेतन, आरोग्य सेवा तसेच इतर तक्रारींबाबत सविस्तर चर्चा केली. उपस्थित प्रत्येक अर्जदाराच्या समस्येची गंभीर दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या कार्यक्रमात सैनिक कल्याण अधिकारी डॉ. निलेश पाटील आणि अपर जिल्हादंडाधिकारी श्री. गजेंद्रकुमार पाटोळे यांनी सहभाग घेत अर्जदारांकडून समस्या स्वीकारून तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. अनेक वीरमाता व वीरपत्नींनी भावनिक संवाद साधून आपले अनुभव व अडचणी मांडल्या. यावर प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक प्रतिक्रिया देत लवकरात लवकर कार्यवाही होईल, असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासनाने सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती असलेली कृतज्ञता आणि जबाबदारी अधोरेखित केली. “वीरांचा सन्मान, राष्ट्राची शान” या भावनेने प्रेरित होऊन हा उपक्रम भावनिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अत्यंत यशस्वी ठरला.



