

जळगाव – अप्रगत मुलांसाठी 60 दिवसांचा कालबद्ध उपक्रम श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने सुरू करण्यात आला आहे . यामध्ये वाचन, लेखन आणि मूलभूत गणिताची तयारी करून घेण्यात येणार आहे. मूलभूत बाबींचा पाया पक्का होणे आवश्यक असल्याने सरावही घेण्यात येणार आहे. दररोज एक तास वाचन आणि लेखन सराव करून घेण्यात येणार आहे. मुलांना रोज सरावासाठी स्वाध्यायही देण्यात येणार आहे. कोव्हिड काळात अचानक मुलांना घरात राहणे भाग पडले. शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना घरात राहून ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले. त्यातही त्यांना अनेक अडचणी आल्या. अशा मुलांना पुस्तकाच्या आधारे थोडेफार शिकता आले, असले तरी बऱ्याच गोष्टी त्यांना समजल्या नाहीत. अशा अप्रगत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याआधारे अप्रगत मुलांचे मूल्यमापन करून त्यांची यादी तयार केली जाणार आहे. शिक्षकांनी केलेल्या यादीनुसार, मुलांना अतिरिक्त वेळेत न समजलेला भाग शिकवला जाणार आहे.शाळास्तरावर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची मदत घेऊन अप्रगत मुलांची तयारी करण्यात येणार आहे. प्रत्येक मुलाच्या नोंदी घेऊन प्रगतीची नोंद केली जाणार आहे. महिन्याच्या शेवटी अप्रगत मुलांची किती प्रगती झाली, याचे शालास्तरावर मूल्यमापन करण्यात येणार आहे. पालकांची मदत घेऊन शिक्षक अप्रगत मुलांना मुख्य प्रवाहात आणतील. या उपक्रमाचे आयोजन शाळेतील मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले आहे.




