

जळगाव : संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी बाल सुरक्षा आणि बालहक्क या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून ॲड ज्ञानदेव वाणी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध धोकादायक परिस्थितींबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला दिला तसेच स्वतःचे संरक्षण कसे करावे, मदत कधी व कशी मागावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
ॲड वाणी यांनी बालहक्क, शिक्षणाचा हक्क, सुरक्षित वातावरणाची गरज, अत्याचारापासून संरक्षण, तसेच पोस्को कायद्याविषयी सोप्या भाषेत माहिती दिली. अलीकडे घडलेल्या मालेगावातील घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विद्यार्थ्यांनी सतर्क राहणे, कोणतीही संशयास्पद घटना त्वरित पालक, शिक्षक किंवा अधिकाऱ्यांना कळवणे किती आवश्यक आहे हे विशेषत्वाने अधोरेखित केले.
व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारत सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक व शिक्षकवृंद यांच्या पुढाकाराने करण्यात आले. शेवटी उपशिक्षिका शितल कोळी यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.



