

जळगाव – येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागातील कॅडेट कृष्णा कैलास पाटील यांनी सिक्कीम मधील तिबेट सीमेपासून जवळ असलेल्या यामथांग व्हॅली पर्वत शिखरावर यशस्वी चढाई करत जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. १७,३३५ फूट उंचीवरील या शिखरावर त्यांनी ३ मे २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता तिरंगा फडकावला.

ही दुर्गम चढाई एन.सी.सी. १८ महाराष्ट्र बटालियनतर्फे आयोजित २८ व्या बेसिक माउंटेनियरिंग कोर्स अंतर्गत करण्यात आली होती. थंड हवामान, ऑक्सिजनची कमतरता आणि खडतर भूगोल अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी ही चढाई यशस्वीरीत्या पार पाडली. या यशामागे नूतन मराठा महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी एस. पी. शिवराज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते कॅडेट कृष्णा पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला अशोक लाडवंजारी, रिंकू चौधरी, किरण राजपूत, सौ. कलाताई शिरसाट, डॉ. संग्रामसिंह सुर्यवंशी, डॉ. रिजवान खाटीक, इब्राहिम तडवी सर, सुनील भैय्या माळी, दीपकआबा पाटील (बोदवड), चेतन पवार, आकाश हिवाळे व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच १८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. चे वरिष्ठ अधिकारी कर्नल अश्विन वैद्य यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले.




