

जळगाव — जिल्हा परिषद, जळगावच्या वतीने नागरिकांच्या अडचणी, तक्रारी व सूचना थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला असून, नागरिकांना आता घरबसल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना जिल्हा परिषद कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता न पडता, त्यांच्या समस्या आणि सूचना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविणे आणि त्यावर त्वरित कार्यवाही करणे हा आहे.
या उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
दररोज सकाळी १० ते ११: या वेळेत नागरिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधता येणार आहे.
थेट संवादाची सुविधा: जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची संधी.
तक्रारींचे त्वरित निवारण: ऐकलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठवून त्या सोडविण्यावर भर.
मुख्य कार्यकारी अधिकारींचा नियमित आढावा: प्राप्त तक्रारींचे निराकरण सुनिश्चित करण्यासाठी सतत पाठपुरावा.
प्रभावी आणि पारदर्शक यंत्रणा: तक्रारींची त्वरित नोंदणी व सोडवणुकीसाठी कार्यक्षम व्यवस्था.
या उपक्रमासाठी आवश्यक असलेली व्हिडिओ कॉन्फरन्स लिंक व QR कोड जिल्हा परिषदेच्या https://zpjalgaon.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.




