

जळगाव, दि. २२ फेब्रुवारी २०२६ — स्मृतीशेष प्रा. शेखर सोनाळकर बौद्धिक व्यासपीठ व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ आज उत्साहात पार पडला. ‘बदलता जागतिक अवकाश व तरुणाईपुढील आव्हाने’ या समकालीन विषयावर प्रमुख वक्ते म्हणून विख्यात लेखक व फ्रेंच तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. शरद बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन जळगाव येथील अल्पबचत भवन येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी कुलगुरू डॉ. के.बी. पाटील यांनी भूषविले. मंचावर डॉ. सत्यजीत साळवे, प्रा. गणपत धुमाळे, प्रा. सौंदाने, डॉ. राजीव पवार, खलील देशमुख होते. कार्यक्रमास विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात डॉ. बाविस्कर यांनी जागतिक, वैश्विक आणि आंतरराष्ट्रीय हे तीन शब्द समानार्थी अर्थाने वापरली जातात मात्र हे तीन शब्द वेगवेगळी असून जग हे स्थळ काळ आणि व्यक्ती सापेक्ष असते ते निरंतर बदलत असते.. “आजची तरुणाई केवळ करिअरपुरती मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणारी असली पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. चिंतनशीलता, वाचनाची सवय आणि वैचारिक स्वातंत्र्य यांवर त्यांनी विशेष भर दिला.
डॉ. के. बी. पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रातील वर्तमान स्थितीवर भाष्य करत तरुणांना मार्गदर्शन केले.
याच प्रसंगी ‘प्रा. शेखर सोनाळकर राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०२६’ चा बक्षीस समारंभही संपन्न झाला. राज्यभरातून सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक चंचल संगीता सुनील द्वितीय क्रमांक कावेरी नेरकर तर तृतीय क्रमांक सारंग पाटील याने पटकावला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला वासंती दिघे यांनी प्रास्ताविक पर मांडणी करत व्याख्यानमालेची भूमिका मांडली. प्रा. धुमाळे यांनी प्रा. शरद बाविस्कर यांचा परिचय करून दिला. तर प्रा. राजीव पवार यांनी विजेत्यांची नावे घोषित केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुश्मिता भालेराव यांनी केले. डॉ. सत्यजीत साळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. पुढील उपक्रमांसाठीही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. व्याख्यानमालेच्या या उद्घाटनाने बौद्धिक चर्चेला प्रेरक दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



