
जळगाव : तरसोद–पारधी बायपास मार्गावरील पुलाचा काही भाग कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून त्यामुळे जळगाव शहरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. पूल तातडीने दुरुस्त करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बायपास मार्ग बंद असल्याने सर्व वाहने शहरातून वळविण्यात आली आहेत. त्यामुळे पिंप्राळा, शिव कॉलनी, प्रभात कॉलनी, रिंग रोड, महाबळ कॉलनी, सिंधी कॉलनी, मेहरून, सुप्रीम कॉलनी, अयोध्या नगर आदी भागांमध्ये वाहतूक कोंडी होत असून विद्यार्थी, नोकरदार, कामगार, नागरिक तसेच रुग्णवाहिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पूल कोसळून पाच दिवस उलटूनही दुरुस्तीच्या कामाला अपेक्षित गती मिळालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विविध स्तरांवर पाहणी, बैठका आणि घोषणांचा सिलसिला सुरू असला तरी प्रत्यक्ष कामात विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचेही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. पूल दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून बायपास मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्यालय जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, माजी नगरसेवक राजू मोरे, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, माजी नगरसेवक सुनील माळी, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष संजय जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळ पाचवणे, रमेश पाटील तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.






