
जळगाव : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा राखी निर्मिती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पालकांनी शाळेच्या परिसरातच विविध साहित्याचा कल्पकतेने वापर करून आकर्षक तिरंगा राख्या साकारल्या.
पालकांनी आपल्या कलाकृतीतून राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान व्यक्त केला. विविध रंग, सजावटीचे साहित्य तसेच पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून पालकांनी एकापेक्षा एक सुंदर राख्या तयार केल्या.
स्पर्धेचे परीक्षण कल्पकता, कलात्मकता, आकर्षकता, साहित्याचा योग्य वापर आणि राष्ट्रभक्तीचा संदेश या निकषांवर करण्यात आले. उत्कृष्ट तिरंगा राख्यांची निवड करण्यात आली असून विजेत्या पालकांना दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या उपक्रमातून पालकांचा शाळेतील सहभाग वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सर्जनशीलता आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व पालकांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.






