

जळगाव : संत ज्ञानेश्वर विद्यालयात माता पालक संघातर्फे भुलाबाई महोत्सव 2025 उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील लोकसंस्कृती जपण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना विविध सण-उत्सवांची माहिती व्हावी या हेतूने शाळेत भुलाबाईची स्थापना करण्यात आली होती.

या निमित्ताने वारली संस्कृतीवर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी वारली संस्कृतीचे विविध पैलू उलगडणारी आकर्षक चित्रे साकारली. तसेच शाळेत भुलाबाई-भुलोजीच्या मातीच्या मूर्ती प्रस्थापित करून गाणी गात उत्सव साजरा करण्यात आला.
भुलाबाई कथा-कला प्रकारातून मुलींना सासरी योग्य वर्तनाची शिकवण दिली जाते. “सासर हे केवळ एक कुटुंब नसून समाजाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक मुलगी ही दोन कुटुंबांना जोडणारा दुवा ठरते आणि भावी आदर्श समाजाचे सृजन करते,” असे प्रतिपादन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले. सदर उपक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




