

जळगाव : संत ज्ञानेश्वर विद्यालयात होळी सणाच्या पार्श्वभूमीवर “रंग एकतेचे” या स्वाक्षरी अभियानाचे आयोजन करण्यात आले. सणाच्या निमित्ताने समाजात एकता, बंधुभाव आणि सकारात्मक विचारांचा संदेश देण्याचा अभिनव प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.
शाळेच्या प्रांगणात इंद्रधनुष्याच्या रंगांनी सजविलेला विशेष फलक उभारण्यात आला होता. प्रत्येक रंगासोबत एक सामाजिक संकल्प जोडण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी त्या संकल्पाला मान्यता देत स्वाक्षरी करून समाजासाठी सकारात्मक बदल घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.

“रंगांनी नव्हे, मनांनी जोडूया नाती”, “पर्यावरण जपा”, “पाणी वाचवा”, “स्वच्छता राखा” अशा संदेशांनी परिसर दुमदुमला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना दृढ करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सणांच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडविणे हीच शिक्षणाची खरी दिशा असल्याचे प्रतिपादन केले. तसेच शिक्षकवृंदांनीही उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.




