
जळगाव : स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथे प्राध्यापक प्रबोधिनी २०२६ चे उद्घाटन मधुमेहतज्ज्ञ डॉ. अमित चित्ते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत समारंभ व सरस्वती पूजनाने झाली.
प्राध्यापक प्रबोधिनीच्या समितीच्या अध्यक्षा प्रा. छाया चौधरी यांनी समितीतर्फे वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची रूपरेषा यावेळी मांडली. त्यानंतर डॉ. अमित चित्ते यांनी ‘चाळिशीनंतरचे आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.
चाळिशीनंतरच्या जीवनात व्हिसेरल फॅट हा आरोग्यावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगत डॉ. चित्ते यांनी योग्य व संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त मानसिकता ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे स्पष्ट केले. मधुमेहापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी नियंत्रित जीवनशैली आणि संतुलित आहार यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना, उत्तम जीवनशैलीचा अवलंब केल्यास संभाव्य आजारांपासून दूर राहण्यास मदत होते, असे सांगितले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. शिल्पा सरोदे, समन्वयक प्रा. उमेश पाटील, प्रा. गुणवंत वंजारी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






