

जळगाव – “पाण्याचा थेंब न थेंब मौल्यवान असून, जल संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील यांनी केले. जागतिक जल दिनानिमित्त मुक्ती फाउंडेशनच्या वतीने विशेष जल जागृती अभियान पत्रकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी, नवलसिंग राजे पाटील, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे एसपी गणेश कर, डॉ. मेहुल पटेल, सागर पाटील, वैभव निकुंभ आदी उपस्थित होते.
या पत्रकामध्ये जल संवर्धनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे. “आज वाचवलेले पाणी उद्या आपल्याला वाचवू शकते. पूर्वीच्या काळी नदीत वाहणारे पाणी आज नळात दिसत आहे, उद्या बाटलीत आणि भविष्यात कदाचित केवळ कॅप्सूलमध्येच पाहायला मिळेल,” अशी महत्त्वाची जाणीव या पत्रकाच्या माध्यमातून करून देण्यात आली.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ती फाउंडेशनच्या जलसंवर्धन उपक्रमाचे कौतुक केले आणि सर्वांनी पाणी बचतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.




