

जळगांव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने श्रावण पौर्णिमेस सर्वत्र साजरा होत असलेल्या विश्व संस्कृत दिनानिमित्त बुधवार दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता श्री आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे जळगाव शहर स्तरीय शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष आयोजन संस्थाध्यक्ष आदरणीय प्रज्ञावंत श्री.नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेनुसार करण्यात आलेले असून या स्पर्धेत शहरातील २५ विविध नामांकित शाळांमधील इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. स्पर्धेचे उद्घाटन स्वामी विवेकानंद भवन येथे डॉ.मृणालिनी फडणवीस (शैक्षणिक संचालिका के.सी.ई. सोसायटी) यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर.बी.ठाकरे, पर्यवेक्षिका प्रा.स्वाती ब-हाटे, समन्वयक प्रा.उमेश पाटील व विविध शाळांच्या शिक्षकांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेत विद्यार्थी श्री.गणेश पंचरत्न स्तोत्र, महिषासुर मर्दिनी स्तोत्र, लिंगाष्टकम स्तोत्र सादर करणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विविध समित्यांमधून ७०पेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या स्पर्धेतील विजेत्या शाळेस आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे फिरता चषक प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्कृताध्यापक प्रा.अर्जुन मेटे व स्पर्धा समन्वयक डॉ.अतुल इंगळे यांनी दिली आहे.




