
जळगाव : नेरीनाका स्मशानभूमीत अंत्ययात्रेनिमित्त गेलेल्या हितेंद्र टेकावडे यांनी तेथील विसाव्यासाठी असलेल्या ओट्याची अस्वच्छ अवस्था पाहून स्वतः पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबविली. नैवेद्य, कणीक पीठ, तेल-तुपाचे दिवे, फुले, अगरबत्ती तसेच इतर साहित्यामुळे ओटा तेलकट व अस्वच्छ झाला होता. परिसरात गुलाल व पिठामुळेही घाण पसरली होती.
ही परिस्थिती पाहून सामाजिक जाणीवेतून प्रेरित होत हितेंद्र टेकावडे यांनी दुसऱ्याच दिवशी सकाळी लवकर नेरीनाका स्मशानभूमीत जाऊन ओटा व परिसराची स्वच्छता केली.
सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, स्मशानभूमीतील ओट्याची स्वच्छता करण्याचे भाग्य लाभल्याची भावना हितेंद्र टेकावडे यांनी व्यक्त केली. हे कार्य त्यांनी ईश्वरी सेवा मानत समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रत्येकाने स्वतः पुढाकार घेण्याची गरज असल्याचे नमूद केले. तसेच, इतरांनीही अशा उपक्रमांतून प्रेरणा घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
हितेंद्र टेकावडे यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबाबत समाजाने अधिक जागरूक होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.






