वासुदेव जोशी गोंधळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वासुदेव जोशी गोंधळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव – वासुदेव जोशी गोंधळी समाजाच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवारा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी वासुदेव जोशी बहुद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटूनही वासुदेव जोशी गोंधळी समाजातील अनेक कुटुंबे आजही शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि कायमस्वरूपी निवारा यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. जातीचे दाखले व इतर आवश्यक कागदपत्रे मिळविण्यात अडचणी येत असल्याने अनेक पात्र नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
समाजातील बेघर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना शासनामार्फत जमीन उपलब्ध करून त्यावर घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, जेणेकरून त्यांना कायमस्वरूपी निवारा मिळून भटकंती थांबण्यास मदत होईल, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय पात्र लाभार्थ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ तातडीने देणे, जातीचे दाखले व इतर आवश्यक कागदपत्रे सुलभपणे उपलब्ध करून देणे, बेघर कुटुंबांना घरकुल मंजूर करणे, बेरोजगार युवक-युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, समाजाच्या वस्त्यांमध्ये आरोग्य, शिक्षण व इतर मूलभूत सुविधा निर्माण करणे तसेच केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेअंतर्गत सध्या वास्तव्यास असलेल्या घरजागा संबंधितांच्या नावावर करून देण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक व तातडीने कार्यवाही करून भटके विमुक्त वासुदेव जोशी गोंधळी समाजाला न्याय द्यावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. निवेदन देतांना वासुदेव जोशी बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनंत जोशी, उपाध्यक्ष हिरामण जोशी, सचिव रवींद्र जोशी, संतोष मोरकर, दगडू विधाते, प्रमोद दोरकर, प्रकाश अहिरराव, सोमनाथ दोरकर, जागेश्वर जोशी, हरीश शिंदे, प्रदीप दोरकर, जयंत गोंधळी, जतीन पोळ, निखिल विधाते, वेदांत जोशी, मयंक जोशी, आशिष गोंधळी, गोविंदा जोशी, गणेश जोशी, सचिन जोशी, विशाल जोशी, जयेश जोशी, शुभम लागवणकर आदि उपस्थित होते.






