
जळगाव (दि. १० एप्रिल २०२६): जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर यांनी आज पदभार स्वीकारताच कामाचा वेग वाढवण्याचे संकेत दिले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते पदभार सोपविण्यात आला. यावेळी सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
माजी सीईओ मिनल करनवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अभियान संचालकपदी बदली झाल्यानंतर या पदावर नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्या नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.
पहिल्याच दिवशी कामाचा धडाका
पदभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी कोणतीही विलंब न करता जिल्हा परिषदेच्या जुन्या व नवीन प्रशासकीय इमारतींना भेटी दिल्या. प्रत्येक विभागात जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच कामातील अडचणी जाणून घेत आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.
या दौऱ्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सकारात्मक अपेक्षा वाढल्या
नवीन सीईओंच्या या सक्रिय आणि प्रत्यक्ष कामकाज पाहण्याच्या पद्धतीमुळे जिल्हा परिषदेच्या कामात अधिक गती व पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनात शिस्त आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी नायर यांच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






