
जळगाव : सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव यांच्या वतीने शनिवार (दि. 7 मार्च) रोजी मोहाडी रोडवरील लांडोरखोरी उद्यान येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थीही कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-शिक्षक अक्षय जाधव यांनी केले. यावेळी प्रथम वर्षाच्या विद्यार्थी-शिक्षिका साक्षी पाटील व सुनीता नाईक तसेच द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी-शिक्षिका प्रियंका पाटील, शिल्पा दुसाने आणि माजी विद्यार्थी-शिक्षिका अर्चना येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी ग्रंथपाल पंकज वाघ सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जीवनात कितीही नैराश्य आले तरी मित्र-मैत्रिणींशी संवाद साधून ते दूर करता येते. संकटांना घाबरून न जाता धैर्याने सामोरे जाणे आवश्यक आहे. त्यानंतर डॉ. जयश्री पाटील यांनी स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे सांगत कुटुंबातील स्त्रियांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले. स्त्रियांना पुढे जाण्यासाठी कुटुंबातील पुरुषांचा आधार देखील तेवढाच महत्त्वाचा असतो, असेही त्यांनी नमूद केले. प्रा. सुवर्ण अहिरे यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिता वानखेडे यांनी विविध प्रसंगांचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी-शिक्षक व शिक्षकांनी एकत्र रिंगणात बसून दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर विविध प्रकारचे खेळ खेळून कार्यक्रमाचा आनंद घेत समारोप करण्यात आला.






