
जळगाव : सद्गुरु एज्युकेशन सोसायटी संचलित सद्गुरु शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शनिवार, १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमास द्वितीय वर्षाचे विद्यार्थी-शिक्षक, प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. प्रतिभा पाटील होत्या.
लेखन प्रेरणा दिनानिमित्त महाविद्यालयात निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘शिक्षणात मराठी साहित्याचे योगदान’, ‘शिक्षणावर साहित्याचा प्रभाव’ आणि ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून प्रतिबिंबित होणारी मूल्ये’ या विषयांवर विद्यार्थी-शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रतिभा पाटील यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना, औपचारिक शिक्षणाची संधी अत्यल्प मिळूनही त्यांनी आपल्या जिद्द, अनुभव आणि असामान्य प्रतिभेच्या बळावर ३७ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, ११ पोवाडे, ३ नाटके, प्रवासवर्णन, लावण्या आणि शेकडो गीतांच्या माध्यमातून मराठी साहित्य समृद्ध केल्याचे सांगितले. तसेच लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, त्यांचे साहित्य, पत्रकारिता आणि त्यांना ‘लोकमान्य’ ही पदवी कशी प्राप्त झाली याबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन निशा भंगाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रतिभा पाटील, डॉ. अनिता वानखेडे, डॉ. जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा. निधी शर्मा, ग्रंथपाल पंकज वाघ तसेच शिक्षकेतर कर्मचारी अरविंद पवार व चंद्रकांत सपकाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी डॉ. श्री. नारायण खडके यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.






