

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा सामाजिक मराठी चित्रपट ‘ते १० दिवस’ २९ जुलैला प्रदर्शित झाला. राघव फिल्म प्रॉडक्शन आणि बंधन प्रॉडक्शन यांच्यातर्फे निर्मित या चित्रपटाचा मंगळवारचा शो विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला, ज्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, नकळतपणे या उत्सवामुळे होणारे जलप्रदूषण हा एक गंभीर प्रश्न बनत आहे. याच समस्येवर ‘ते १० दिवस’ या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमात नैसर्गिक गणेशोत्सव, मातीच्या मूर्ती आणि जलप्रदूषण टाळण्याबाबत दिलेल्या संदेशावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक भारत वाळके आहेत. यात पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवा आणि नैसर्गिक गणेशोत्सवाचे महत्त्व यांसारखे महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आले आहेत. समाजाला व शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल जागृत करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखविण्यासाठी चित्रपटांच्या टीमला मागणी केली होती. सदर उपक्रमाला स्वाती पवार व शरद पवार यांचे मार्गदर्शन लाभले.




