जळगावप्रशासकीय

‘एल निनो’च्या संभाव्य पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बैठकीत जिल्ह्यातील पाणीसाठा व खरीप हंगामाचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा

जळगाव, दि. 16 जून ( जिमाका ): हवामान बदल आणि ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांचा विचार करून भविष्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तसेच खरीप हंगामाचे प्रभावी नियोजन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत जिल्हानिहाय पाणीसाठा, जलसंधारण, शेती सज्जता आणि कृषी इनपुट उपलब्धता यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान जिल्ह्यातील प्रमुख, मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठ्याची सद्यस्थिती, पाणी विसर्गाचे नियोजन आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन यावर चर्चा झाली. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

तसेच आगामी खरीप हंगामासाठी पिकांची लागवड स्थिती, बियाणे व खतांचा पुरेसा साठा आणि शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्धता याबाबत कृषी विभागास आवश्यक निर्देश देण्यात आले. बियाण्यांची टंचाई निर्माण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सुचना घेण्यात आल्या.

हवामानातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व स्तरांवर सज्ज राहून शेतकरी बांधवांना तांत्रिक मार्गदर्शन, हवामानविषयक माहिती आणि वेळोवेळी आवश्यक सूचना देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रशासन, महसूल, जलसंपदा आणि कृषी विभाग यांच्यात समन्वय ठेवून संभाव्य परिस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना सुरू असून संबधित सर्व विभाग समन्वयाने काम करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button