
जळगाव : बालरत्न फाउंडेशनच्या वतीने राजीव गांधी नगर परिसरामध्ये मोठ्या उत्साहात बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन व कामगार दिन संयुक्तरित्या साजरे करण्यात आले. सामाजिक ऐक्य, प्रेरणा आणि सेवाभाव यांचा संगम असलेला हा कार्यक्रम परिसरातील नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. महिला मंडळाच्या सदस्यांसह बालरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष व कार्यकर्ते नरेश राखपसरे, नीलिमा कजबे, राकेश बडोले, नितीन राखपसरे, निलेश मोरे, शुभम मोरे आणि राहुल नन्नवरे यांच्या हस्ते हा विधी पार पडला.
या प्रसंगी उपस्थितांनी गौतम बुद्धांच्या करुणा व शांततेच्या विचारांचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य व सुशासनाच्या तत्त्वांचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या संदेशाचा गौरव केला. वक्त्यांनी आपल्या मनोगतातून या महापुरुषांच्या कार्याची उजळणी करत समाजाने त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमादरम्यान परिसरातील नागरिक, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना खीर वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अशा प्रकारचे उपक्रम राबवून समाजात एकोपा, सामाजिक जाणीव आणि सेवाभाव वृद्धिंगत करण्याचे कार्य बालरत्न फाउंडेशन सातत्याने करत असल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले.





