

जळगाव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा इ.१२वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आयुष महेंद्र भामरे याने नुकत्याच झालेल्या भारतीय ज्ञान परंपरा ऑलिम्पियाड २०२५ मध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादित करीत द्वितीय क्रमांक पटकावला.
ही स्पर्धा केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या वतीने प्रथमच राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आली होती. देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. कठीण प्रश्नपत्रिका, पारंपरिक ज्ञान, वेद, उपनिषद, शास्त्र, भारतीय गणित आणि सांस्कृतिक परंपरा या विषयांवर आधारित परीक्षेत कनिष्ठ महाविद्यालयीन विभागात आयुषने १०० पैकी १०० गुण मिळवत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली.
दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी जयपूर येथे होणाऱ्या केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या स्थापना दिन सोहळ्यात सर्व राष्ट्रीय विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमात आयुषला विशेष सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व रोख रक्कम ५०००/- देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.
त्याच्या या यशाबद्दल के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे,प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे, उपप्राचार्य प्रा. आर.बी ठाकरे, पर्यवेक्षिका प्रा.स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा.उमेश पाटील, संस्कृताध्यापक प्रा. अर्जुनशास्त्री मेटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद व सहाध्यायींनी अभिनंदन केले.




